Post Views: 34
नांदेड प्रतिनिधी- वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील मौजे बिजुर येथील दलित वस्तीत सुरू असलेल्या सी.सी. रस्त्याच्या बांधकामावर गंभीर अनियमिततेचे आरोप करण्यात आले असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पंचायत समितीकडे केली आहे.
तक्रारदार भास्कर बळीराम वाघमारे व गंगाधर शंकर इबितकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार होत नसून बांधकामासाठी वापरला जाणारा कच्चा माल अत्यंत कमी प्रमाणात वापरला जात आहे. या संदर्भात अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच ग्रामसेवकांकडे चौकशी केली असता त्यांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणात अभियंता व ग्रामसेवक यांनी आर्थिक तडजोड करून शासनाची दिशाभूल केली असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून कामाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करून शासनाचे नुकसान वसूल करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, १५ दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
Author: Vaibhav Ghate
Vaibhav Ghate Nanded Dist Reports.mobile no :-7972118734








